भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी तरुण क्रिएटर्सना खास आवाहन केलं. “आपल्याला माणसांना रोबॉट नाही बनवायचंय. आपल्याला माणसाला अधिकाधिक संवेदनशील आणि समृद्ध करायचं आहे”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ‘क्रिएटिव्ह रिस्पॉन्सिबिलीटी’वर अधिक भर दिला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तंत्रज्ञानाची भूमिका वाढत असतानाच मानवी संवेदना कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.




