Home » Today In Focus » राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं

राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं

राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे,  गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरली लावली आहे.

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला आहे, जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा,मितावली शिवारात जोरदार गारपीट झाली आहे. दुसरीकडे   जळगाव तालुक्यातील भादली, खेडी भोकर , भोकर, तसेच यावल तालुक्यात मोहराळा सावखेडा यासह इतर गावांमध्ये देखील गारपिटीसह पाऊस झाला आहे. या गारपिटीमुळे शेतातील रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका व इतर पिकांसह फळपिकांना मोठा फटका बसला आहे. चोपडा तालुक्यात अंदाजे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सकाळी कडाक्याचं ऊन पडलं असताना, दुपारच्यावेळी अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.

दुसरीकडे पुणे जिल्ह्याला देखील पावसानं चांगलंच झोडपून कढलं आहे,  पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.  अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे पावसानं हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्यात आज अचानक हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच आकाशात काळसर ढगांनी वेढा घातला असून, वादळी वाऱ्याला सुरुवात झालेली आहे. वातावरणात गारवा जाणवत असून, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान खात्यानं जिल्ह्याला जोरदार वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी अश्रय घ्यावा, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पावसामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment