Home » Today In Focus » शेतकरी कर्जमाफीवर राजू शेट्टी आक्रमक

शेतकरी कर्जमाफीवर राजू शेट्टी आक्रमक

राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उफाळून आलाआहे, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून कर्जमाफीचं अश्वासन देण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आहे. महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळालं. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांचे राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं.

दरम्यान राज्यात आता महायुतीचं सरकार आलं आहे, शेतकऱ्यांच्या नजरा कर्जमाफीकडे लागल्या आहेत. मात्र अजूनही त्याबाबत कोणतीच हालचाल होताना दिसत नाहीये, दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं सुरू असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. याविरोधात आता प्रहार जनशक्ती पक्षानं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

स्वाभिमानीचाही असाच निर्णय झालेला आहे, महायुतीने निवडणुकीच्या काळात सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलं होतं. हमीभावाच्या 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती, या दोन्ही घोषणा हवेत विरल्या आहे. शेतकरी आक्रमक झालेला आहे.आणि सध्या आमचीही जनजागृती सुरू आहे. प्रहारने जसं सत्ताधाऱ्यांच्या घरी जाऊन आंदोलन केलं तसं आम्ही महायुतीच्या मंत्र्यांना कार्यक्रमात जाऊन जाब विचारणार आहोत, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

तुमची औकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं, तर आश्वासन का दिलं? असा सवाल यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार सांगतात आम्ही आता सातबारा कोरा करू शकत नाही, राज्याची तशी स्थिती नाही. मग महायुतीने खोटं अश्वासन का दिलं, शेतकऱ्यांना का गंडवलं?  राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे तर, शक्तिपीठ सारखे खर्चिक प्रकल्प महाराष्ट्रावर का लादत आहात?  त्यामुळे यापुढे महायुतीच्या नेत्यांना राज्यात फिरणं मुश्किल करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?