महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे योग्य हमीभाव न मिळाल्याचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तर यंदा मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. महाराष्ट्रातील विधिमंडळात अनेकवेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आता हाच मुद्दा थेट संसदेत उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी सोयाबीन, टोमॅटो तसेच अन्य पिकांना मिळणारा भाव, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, याला केंद्रस्थानी टेवून संसदेत जोरदार भाषण केले. विशेष म्हणजे हे भाषण करताना त्यांनी महात्मा फुले यांची पगडी घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भाषण करताना ते म्हणाले की, “माझ्या नारायणराव येथील शेतकऱ्यांना आज 4-5 रुपये किलो दराने टोमॅटो विकावा लागतो. हाच टोमॅटो शहरी भागात 20-25 रुपये किलो दराने विकला जातो, याचे कारण आहे दलालांची साखळी. सरकारने या संदर्भातही विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय.
“अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकरी हेक्टरी 30 क्विंटल उत्पादन घेतात, तर भारतात केवळ 10 क्विंटल उत्पादन होते. कारण अमेरिकेतील शेतकऱ्यांना जेएम व्हरायटी बियाणे वापरण्याचा अधिकार आहे, जो भारतातील शेतकऱ्यांना नाही. विशेष म्हणजे सरकार आयात करीत असलेले खाद्यतेल ते जेएम व्हरायटीचे असले तरी चालते, पण शेतकऱ्यांना जेएम व्हरायटी बियाणे वापरु शकत नाहीत. थोडक्यात जिथे अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करतेय तिथे भारतीय शेतकरी मात्र हमीभावासाठी झुंजतोय,” असे म्हणत अमेरिका आणि भारतातील शेती धोरणाच्या विसंगतीकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले.
महाकुंभ संदर्भात पंतप्रधानांनी ‘नदी का उत्सव मनाना चाहिए’ असे म्हटले. परंतु जेव्हा नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि पुनरुज्जीवन होईल, तेव्हाच खरा नदीचा उत्सव होईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कैलास नागरे या प्रगतीशील युवा शेतकऱ्याने शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली, हा आपल्या धोरणांवर एकप्रकारचा ‘तमाचा’ नाही का? असा जळजळीत सवाल त्यांनी केला. देशातील धरणांमध्ये गाळ साचल्याने 30 ते 40 टक्के साठवण क्षमता कमी झाली आहे. परंतु हा गाळ काढण्याची कोणतीही तरतूद नाही, याकडे लक्ष वेधून खासदार डॉ. कोल्हे यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी, उत्तम दर्जाचे बियाणे आणि शेतमालाला योग्य दर द्यावा. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्याची मोकळीक द्यावी, म्हणजे त्याला सरकारच्या प्रतीदिन 17 रुपयांच्या सन्मानाची आवश्यकता भासणार नाही, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली. तसेच सध्या सर्वत्र खोदाखोदीचे राजकारण सुरू आहे, ‘मस्जिद के नीचे तुम मंदिर क्यों ढुंढते हो, भविष्य की ओर देखो, इतिहास पर क्युँ लढते हो, वह लढायेंगे भडकायंगे, लेकिन राष्ट्रहित का रुख तू कर, किसानों के हित में सदा इन्सानियत की बात कर’ या कवितेने आपल्या भाषणाचा समारोप त्यांनी केला.



