दिशा सालियनच्या अकस्मात मृत्यू प्रकरणी पाच वर्षांनंतर तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआय चौकशीची मागणी देखील करण्यात येतेय, तर या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत आणि दिशाला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत.

पाच वर्षांपूर्वी दिशा सालियान हिचा अकस्मात मृत्यू झाला, हे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही त्यांची मागणी आहे. पाच वर्षांवी हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्यावर केस दाखल करून त्यांना अटक करून चौकशी करावी अशी सत्ताधाऱ्यांची मागणी आहे. तर औरंगजेबाचे प्रकरण अंगावर शेकल्याने त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. दिशा सालियन प्रकरणावरू आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची ‘सीबीआय’कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्याप्रकरणी दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून, दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी आंदोलना दरम्यान केली आहे.



