“प्रशांत कोरटकरने एका उन्मादातून फोन केला होता, हे सिद्ध होतं. त्याला वाचवणारी कुठलीतरी यंत्रणा आहे, म्हणून तो एक महिना सापडत नव्हता, एका महिन्याने तो सापडतो, कोणाचा सपोर्ट असल्याशिवाय हे होणार नाही. त्याला सपोर्ट करणारी ती कुठली यंत्रणा आहे? ते पोलिसांनी शोधून काढावं” असं इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले. आरोपीचे वकिल म्हणतात की, ही मीडिया ट्रायल आहे, त्यावर इंद्रजीत सावंत म्हणाले की, “मला कायदेशीर समजत नाही, पण मीडिया ट्रायल असण्याचा संबंध नाही. स्वतहून मला फोन कर, घाणेरडं, विषारी वक्तव्य करं हे मी त्याला सांगायला गेलो नव्हतो”

“मला 12 वाजता फोन आला. मला तीन-साडेतीनपर्यंत झोपच आली नाही. कारण महाराष्ट्रात जिजाऊ, शिवराय, शंभू राजांबद्दल अशी वक्तव्य करणारी माणसं जिवंत आहेत. हे पटतच नव्हतं. ही घाण लपवून ठेवली, तर जास्त दुर्गंधी येणार, म्हणून समाजासमोर आणलं. माझा तो अधिकार आहे. माझ्या फेसबुकवर समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, अशा गोष्टी मांडू शकतो, लिहू शकतो” असं इंद्रजीत सावंत म्हणाले.
प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर शिवभक्त आक्रमक झालेत, यावर इंद्रजीत सावंत म्हणाले की, “महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे अनुयायी आहेत, ते व्यथित झाले. अशी घाण महाराष्ट्रात असूच कशी शकते. त्यामुळे काही घटना घडल्या असतील. ती रोष व्यक्त करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना आवाहन करतो की, त्यांनी कुठलाही कायदा हातात घेऊ नये. संवैधानिक मार्गाने आंदोलन करावं”.



