आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले पाहता खबरदारीचा इशारा म्हणून केंद्र सरकारने बीसीसीआयला सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची आज बैठक पार पडली. या बैठकीत ही स्पर्धा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 57 सामन्यांचा खेळ पूर्ण झाला आहे. तसेच 58 वा सामना अर्धवट राहिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुन्हा आयोजित केली जाईल तेव्हा नव्याने खेळावा लागेल असं दिसत आहे. खरं तर या सामन्यात पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली होती. पण क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कोणत्याही क्षणी सामन्याची बाजूने पालटू शकते. यामुळे हा सामना जेव्हा परत कधी स्पर्धा सुरु होईल तेव्हा नव्याने खेळवला जाईल, असं सांगण्यात आहे. या सामन्यामुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होणार आहे. त्यामुळे हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा पुन्हा कधी आयोजित केली जाईल याबाबत अस्पष्टता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू राहणे चांगले वाटत नाही.”

आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक आणि खेळाडूंची उपलब्धता हे दोन्ही गोष्टींचा तालमेल बसवावा लागणार आहे. अजूनही 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. हे 17 सामने कसे आणि कुठे खेळवायचे याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. याच वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्डकप होणार आहे. तर आशिया कप स्पर्धेचं आयोजनही केलं जाणार आहे. त्यामुळे मैदानं आणि इतर गोष्टींची जुळवाजुळव करावी लागेल. बांगलादेश दौऱ्यासाठी आणि आशिया कपसाठी राखीव ठेवलेली वेळ स्पर्धा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
आतापर्यंत तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आऊट झाले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होईल हे मात्र निश्तित आहे. तर प्लेऑफच्या शर्यतीत एकूण 7 संघ असून त्यांच्यात टॉप 4 साठी लढत सुरु आहे.




Users Today : 26