वैभव सूर्यवंशीने अवघ्या 14 व्या वर्षी झंझावाती शतक ठोकून सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावली. त्याने 35 धावात 100 धावा चोपल्या. त्याचे षटकार आणि चौकारांनी मैदानावर त्या दिवशी बहार आणली. प्रेक्षक म्हणतात या छोकर्याने तर डोळ्याचे पारणे फेडले. पण आता त्याच्याविषयी एक वाद उभा ठाकला आहे. माजी मुष्टीयोद्धा आणि ऑलम्पिक पदक विजेता विजेंद्रर सिंह याने त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे. काय आहे तो आरोप? वैभववर खरंच होणार का कारवाई?

बॉक्सर विजेंद्रर सिंह याने वैभव सूर्यवंशी याची तुफान फटकेबाजी पाहिली. त्यानंतर त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली. आजकाल काही जण वय लहान करून क्रिकेट खेळत आहेत. अशी एका ओळीची पोस्ट त्याने लिहिली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. काही जण उलट विजेंद्रर सिंह यालाच सल्ले देत आहेत. त्यांनी वय नको, त्याचे टॅलेंट बघ असा सल्ला विजेंद्रर याला दिला आहे.
वैभव सूर्यवंशी याच्यावर वय लपवल्याचा आरोप या शतकी खेळीनंतर जास्त प्रमाणात करण्यात येत आहे. तो अवघ्या 14 वर्षांचा आहे. पण शरीर यष्टीने तो सदृढ आहे. त्याची फलंदाजी आणि आक्रमक खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. तो 90-90 मीटर षटकार चोपत असल्याने त्यावर अनेकांनी सवाल केला आहे. 14 वर्षाच्या मुलाला इतक्या दूरवर चेंडू टोलवता येणे अशक्य असल्याचा दावा अनेक जण करत आहेत. अर्थात भारतीय क्रिकेट बोर्डाने BCCI ने त्याच्या वयाची पडताळणी केल्याचा दावा करण्यात येतो.
भारतीय खेळाडूंनी वय लपवल्यास, ते खोटे सांगितल्यास बीसीसीआय कडक कारवाई करते. अशा खेळाडूंवर बंदी आणण्यात येते. वयाचा खोटा पुरावा देऊन खेळणाऱ्या खेळाडूंवर दोन वर्षांकरीता बंदी घालण्यात येते. या काळात तो बीसीसीआयने आयोजित केलेल्या कोणत्या टुर्नामेंट अथवा इतर सामन्यात खेळू शकत नाही. यापूर्वी काही भारतीय खेळाडूंवर अशी कारवाई झाल्याचे समोर आले आहे.




Users Today : 26