Home » Today In Focus » अजित पवार यांचं लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा भाष्य

अजित पवार यांचं लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा भाष्य

गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ‘ जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.आतापर्यंत एकूण नऊ हफ्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं बोललं जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिल होते. विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आलं. विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता 3 ते 4 महिने होत आले. मात्र त्यानंतरही लाडक्या बहिणींना दरमहिना 2100 रुपये मिळालेले नसून ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत.

विरोधकांनी तर या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. तसेच सरकार इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पण ही योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते, मंत्र्यांतर्फे देण्यात आलं. पण तो दिवस कधी उजाडणार हे काही स्पष्ट झालेलं नाही.

आता याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं, सूचक विधान केलं आहे. लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणारा असं अजित दादा म्हणाले. पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना 2100 नेमके कधी मिळणार हे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितलेले नसून ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. बीडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकरी कर्जमाफीबद्दल काय म्हणाले अजित दादा ?

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार आले तर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असे आश्वासन दिलं होतं. पण आता सरकार आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना कर्जमाफीचा विसर पडल्याचे दिसत आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक मोठे विधान केले होते. काही महिन्यापूर्वी अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान एक विधान केलं, आपण कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नाही, असे म्हटले. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवारांनी केले होते. त्यानंतर 31 मार्चच्या आत कर्जभरणा करा असेही ते म्हणाले होते. त्यावरूनही बरीच टीका झाली होती. आजच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरूनही अजितदादा स्पष्ट बोलले. पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली. पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो, असे ते म्हणाले.

कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, टायर मध्ये घ्या असं सांगेन – अजित दादांचा सज्जड इशारा

यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत, ते वेळीच सुधारा. आमचे नेते वर बसलेत, आमचं कोण काय वाकडं करतंय असं मनात आणू नका. तुम्ही काही मॅसेज केला तर तो परत काढता येतो. असे लोक कोण सापडले तर मी अश्या लोकांना सोडणार नाही. सत्तेतले असो किंवा विरोधातले असतील, कोणीही असेल तर त्याला टायरमध्ये घ्या असं मीच सांगेन. मकोका लावायला सांगेन, कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराच अजित पवारांनी महायुतीचे कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?