कुणाल कामराच्या विडंबनात्मक शो नंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीमुळे संजय राऊत संतापले. राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करण्याचीही मागणी केली आहे. राऊत यांनी कामरावर होत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

कॉमेडियन कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसैनिक भडकले आहेत. शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, कामराने त्यांच्यावर टीका केली, जी शिवसैनिकांना बरीच झोंबली. तो शो जिथे होता, त्या हॉटेलमध्ये जाऊन काल रात्री शिवसैनिकांनी शोच्या सेटची तोडफोड केली. मात्र याच मुद्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले असून मुंहईत झालेल्या तोडफोडीनंतर या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार झाला, त्या पोलीस स्टेशनचे एसीपी, सीनिअर पीआय यांच्यावर ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे,असे राऊत म्हणाले. कुणाल कामराचे जे नुकसान झालं ते दंगलखोरांकडून वसूल करा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहखातं चालवणं झेपत नाही, हे स्पष्ट दिसतं. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे. काय केलं त्यांनी? हा संपूर्ण कट दीड दोन तास आधी शिजला. काय करत होते मुंबईचे पोलीस. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार झाला, त्या पोलीस स्टेशनचे एसीपी, सीनिअर पीआय यांच्यावर ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. इतकं गंभीर प्रकरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत देशात आपल्या राज्याची नाचक्की होत आहे असं राऊतांनी सुनावलं. आपले गृहमंत्री भाषणं आणि प्रवचनं देत फिरत आहेत. मग दंगलखोरांवर कारवाई करा आणि कामराचं नुकसान झालं ते दंगलखोरांकडून वसूल करा. कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. सोशल मीडियावरून धमक्या दिल्या जात आहेत. हे कोण लोकं आहेत. आम्ही धमक्यांना भीक घालत नाहीत. पण तो कलावंत आहे,. त्याला संरक्षण द्या असं म्हणत नाही. पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा असं संजय राऊत म्हणाले.




Users Today : 25